http://sites.google.com/site/neerajasspace/aatalyasahitmaan इथे वरून दुसर्या ओळीतले डावीकडचे दोन फोटो. पहिला आहे तो प्रिय कवितेचा दुसरा भाग/ शेवट आणि दुसरा आहे तो वादळवेडीचा शेवट.
-------------------------------------------------------------
तिला सुसाट वार्याचं वेड होतं
वेळीअवेळी बांबुच्या बनातुन वारा घुमायचा,
अन् तिच्या पोटातुन चंद्र आडवा उभा सरकायचा.
भारल्यासारखी ती बाहेर पडायची,
पिसाटल्यासारखी काहितरी शोधत रहायची
"कन्या राजे पुरे आता, परतूया."
धापा टाकत दासी म्हणायची.
हो, तशी ती होती राजकन्या,
लाडाकोडात वाढलेली, दुधातुपात न्हायलेली.
तिच्यासाठी महालात कितीतरी झरोके होते,
भर दुपारी मंद झुळका येईल असे,
आणि कितीतरी पंखे,
गोर्या साहेबाच्या राज्यातले.
पण तरी तिला सुसाट वार्याचं वेड होतं!
एकदा अरण्यात रानपाखरं अचानक ओरडायला लागली
मिळेल त्या आसर्याला जाउन राह्यली.
तिनं चकीत होऊन बघितलं
येणार्या वार्याच्या लोळानं तिला खेचून घेतलं.
जीवाच्या जिवलगानं मिठीत घ्यावं तसं.
तिनंही त्या वादळाला सगळं अर्पून टाकलं
हलकी झाली आणि हवेत वर वर चालली
असं तिला सुसाट वार्याचं वेड होतं
वेडे लोक!
सांगतात तिला झंझावातानं उडवून नेलं
- नी

